Wednesday, February 19, 2020

‘इम्तियाझ’ आज कल…


कोलकात्यामध्ये हरलीनच्या घरासमोरील बाकड्यावर ऐटीत बसून खास तिने करून आणलेलाब्लॅक टीचवीने पिणारा वीर आठवतोय? सॅनफ्रान्सिस्कोच्या फुटपाथवर गुंडांकडून मार खाल्यानंतर आपलं खरं मीरावर प्रेम असल्याची जाणीव होऊन एकटाच हसत-रडत सुटणारा जय? किंवा जयने अखेरीस प्रपोज केल्यावर इतके दिवस आत दाबून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारी मीरा? इम्तियाझच्या मनावर कोरल्या गेलेल्या फ्रेम्सपैकी या काही...
31 जुलै, 2009 च्या दिवशी तास बुडवून, सात-आठ जणांना गोळा करून पावसाच्या रिपरिपीमध्ये चिखल-खड्ड्यांतून वाट काढत आणि अॅडव्हान्स बुकिंगसाठी एक तास आधी जाऊन तसाच भिजलेल्या रेनकोटमध्ये राहुल टॉकिजला लव्ह आज कल’चा फर्स्ट डे मॅटेनी शो पाहिला होता, तोपर्यंत इम्तियाझ अली स्टाइल ऑफ फिल्ममेकिंग हा ब्रँड म्हणून प्रस्थापित व्हायचा होता. त्याने त्याआधी फक्त दोन चित्रपट दिग्दर्शित केले होते आणि दोन्ही लव्हस्टोरीज् एकमेकांपेक्षा खूप भिन्न असूनही आपला असा फॅनबेस तयार करण्यात हे चित्रपट यशस्वी झाले होते. त्यातला जब वी मेटतर व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरल्यामुळे इम्तियाझ ए-लिस्टर्स’मध्ये पोहोचला होता. अर्थातच त्या लव्ह आज कलवर जब वी मेटच्या अपेक्षांचे ओझे होते आणि इम्तियाझने ते यशस्वीरीत्या हाताळले होते. चित्रपट पाहिल्यानंतर जब वी मेटच्या तुलनेत लव्ह आज कल’ला डावा ठरवणाऱ्यांनाही नेमक्या टिकेवर बोट ठेवता आले नव्हते. चित्रपट थक्क किंवा प्रभावित करणारा नसला, तरी आवडूनसा गेला होता.
त्यानंतर, इम्तियाझ चकित करत गेला. सरप्रायझेस देत गेला, प्रत्येक चित्रपटातून स्वतःची स्टाइल अधोरेखित करत गेला आणि त्याचवेळी नवनवे प्रयोग करून त्यांना आपल्या स्टाइलमध्ये सामावून घेत गेला. (त्याचा जब हॅरी मेट सेजलमी पाहिला नसल्यामुळे हे निरीक्षण  बाकीच्या सहा चित्रपटांपुरते आहे.)
कट टू 14 फेब्रुवारी, 2020. इम्तियाझ आता स्थिरावला आहे. अगदी जब हॅरी मेट सेजलचे दारुण अपयशही त्याला हादरवू शकणार नाही, इतका. त्याचप्रमाणे, इतक्या चित्रपटांनंतर त्याच्या सरप्रायझेसचा आवाका नक्की कुठपर्यंत असू शकतो, याची बऱ्यापैकी कल्पना येऊ लागली आहे. आणखी एक गंमतशीर गोष्ट म्हणजे, इतक्या वर्षांत त्याने मोडलेल्या चौकटींचाही आता एक साचा तयार झाला आहे. त्याच्या चित्रपटातल्यासारखी वास्तविकता आणि कल्पना (रिअॅलिझम आणि फँटसी) यांच्या सीमारेषेवर उभी असणारी पात्रे, वरवरची खपली काढल्यानंतर उघडे पडणारे त्यांचे गोंधळ, इनसिक्युरिटीज्, आयडेंटिटी क्रायसिस इत्यादी सॉर्ट आउट होईपर्यंतचा प्रवास आदी एकेकाळची अपारंपरिक (unconventional) लक्षणे आता इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधूनही सर्वपरिचित झाली आहेत. त्यामुळे एकाच वेळी इम्तियाझचा ट्रेडमार्क असलेलं सगळं तो त्याच्या चित्रपटात करतो का, आणि त्यापेक्षा वेगळं काही करू बघतो का, या दोन टोकांवर इम्तियाझच्या फॅनबेसचा लंबक झुलत असतो.
नव्या लव्ह आज कलबद्दल बोलायचं झाल्यास, यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचअंशी सकारात्मक आहे. किंबहुना, इम्तियाझच्या आतापर्यंतच्या चित्रपटातील प्रत्येकाची काही ना काही झलक या लव्ह आज कलमध्ये पाहायला मिळते. ये दूरियाँकिंवा जिंदगीसारखे चित्रपटाचा टोन सेट करणारे गाणे आहे, ‘तुमसे ही गाण्यात आदित्य काल्पनिक गीतसोबत पावसात बेभान होऊन नाचतो, तसे नृत्य आहे, ‘तमाशातील वेदप्रमाणे आपल्या उपजत व्यक्तिमत्त्वाला दाबले जाणे आहे आणि उत्कट क्षणी त्याचे विस्फोटकरीत्या बाहेर येणे आहे, रॉकस्टारच्या जनार्दनचा आत्मनाशापासून आत्मशोधापर्यंतची (Self distruction to self-discovery) वाटचाल आहे, इम्तियाझचा आवडता हिमालय आहे आणि त्याच्या सानिध्यात हायवेतल्या वीराला मिळणारी शांतताही आहे. सोबतीला रूमी आहे, इर्शाद कामीलचे गहिरे शब्द आहेत, प्रितम क्वचितच देतो, तसे ठेवणीतले संगीत आहे, अरिजितचा सोलफुल की काय म्हणतात, तसा आवाज आहे, इम्तियाझची स्वत:ची अशी दृश्यात्मकता आहे आणि तरीही

हे सर्व साकारण्यासाठी इम्तियाझने निवडलेला प्लॉट आणि फॉर्म हे दोन्ही भलतेच सरधोपट असल्याने एकूण परिणाम उणावतो. दोन काळांना एकत्र आणणारे सामायिक नेपथ्य म्हणून इम्तियाझ पुन्हा एकदा कॅफे-रेस्टॉरंट निवडतो, इथपर्यंत ठीक; पण तेथे घडणारे संवाद आणि उलगडणारे प्रसंग पाहता आधीच्या लव्ह आज-कलचा प्रभाव म्हणावा की कॉपी-पेस्टअसा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. यावेळी बदल म्हणून लव्ह आज कलपैकी आजच्या कथानकाची प्रोटॅगनिस्ट ही नायिका आहे आणि नायक तिचा लव्ह इंटरेस्टआहे. त्याचवेळी कलची कथा मात्र नायकाच्या नजरेतून उलगडते. हे दोन्ही पात्रांचे भार यशस्वीपणे पेलण्यात लेखन पातळीवर इम्तियाझ आणि अभिनय पातळीवर अनुक्रमे सारा अली खान (झोई) आणि रणदीप हुडा (रघू) कमी पडले आहेत. साराचा संपूर्ण चित्रपटभर वावर आत्मविश्वासपूर्ण असला, तरी आवाजाच्या एकसुरी प्रोजेक्शनमुळे तिच्या मर्यादा उघड होतात. याउलट रणदीपसारख्या ताकदीच्या अभिनेत्याला संहितेनेच जखडून ठेवल्यामुळे तो निवेदकाच्या स्तरावर येऊन थांबतो आणि ऋषी कपूर यांनी वीर सिंग पानेसरच्या व्यक्तिरेखेला दिलेल्या चार्मच्या जवळपासही पोहोचू शकत नाही.
वीर (कार्तिक आर्यन) हे नव्या लव्ह आज कलमधील सर्वांत कॉम्प्लेक्स पात्र आहे. त्याच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला कंगोरे आहेतच, पण त्याचबरोबर त्याची प्रेमकथेतील भूमिका (म्हणजे त्याने घेतलेली) ही तमाशातील ताराच्या भूमिकेला साजेशी आणि अधिक व्यापक आहे. याच गुंतागुंतीमुळे या लव्ह स्टोरीला वेगळे डायनॅमिक्स प्राप्त होते. तथापि, हे पात्र इम्तियाझ बहुतांश वेळा झोई किंवा रघूच्या नजरेतून दाखवतो आणि त्याचवेळी झोईच्या पात्राला कधीच स्वत:बाहेर पडू न दिल्यामुळे वीर व तिच्यामधील कॉन्फ्लिक्ट गडद करण्याची संधी गमावतो. तीच गोष्ट १९९० च्या रघू आणि लीना (आरुषी शर्मा) या जोडीची. तुटक-तुटक प्रसंग जोडून एकत्र बांधलेली ही विसविशित कथा ना एकाही क्षणी रिलेटेबल होते, ना धड नॉस्टॅल्जिया आळवते, ना आजच्या काळाशी समरूपता दर्शवते. कार्तिकचा अभिनय वीरच्या भूमिकेत आणि टीनएजर रघूच्या भूमिकेत प्रभावी आहे. वीरवरची पकड तो शेवटपर्यंत कायम ठेवतो, मात्र रघूचा कालानुक्रम दाखवण्यासाठी देण्यात आलेल्या प्रत्येक नव्या गेट-अपगणिक त्याची कामगिरी खालावते. आरुषी शर्मा चित्रपटात फक्त आहे.

आता दुसरा प्रश्न मग, इम्तियाझ वेगळं नक्की काही करतो तरी का? याचे उत्तर मात्र नकारार्थी द्यावे लागते. खरेतर बिलिव्हेबल व्यक्तिरेखा निर्माण करणे आणि त्यांना रिलेटेबल संवाद देणे हे इम्तियाझचे बलस्थान. मै अपनी फेव्हरिट हूँ!,’ हे गीतचे वाक्य आजही कितींचे फेव्हरिट आहे... किंवा हम नॉर्मल लोग है... आम जनता, दि मँगो पीपल!,’ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. ही पात्रे सर्व मानवी गुणावगुणांची सरमिसळ आहेत. ही पात्रे त्याग करताना उदात्त होत नाहीत आणि स्वार्थी वागताना अपराधीही होत नाहीत. इम्तियाझ त्यांना मानवी पातळीवर आणून identifiable बनवतो. ‘जब वी...’ मध्ये आपण मनजीतसोबत चुकीचे वागतोय, हे माहीत असूनही गीत तसे वागणे सुरू ठेवते. लव्ह आज कलमध्ये मीरा नुकताच पती झालेल्या विक्रमला ‘मी तुझी नंतर माफी मागेन, पण आता मला निघायचंय’, असे स्पष्टपणे सांगते. ही कॅरेक्टर्स एकाच वेळी अविचारी आणि समजूतदार असतात. हायवेमध्ये वीरा ‘मूल होऊन अपहरणकर्त्या भाटीच्या कुशीत शिरते. मात्र, तो जेव्हा आईच्या आठवणीने व्याकूळ होतो, तेव्हा त्याला आई बनून सांभाळूनही घेते. सोचा ना थामध्ये वीरेनला मिळवण्यासाठी आकांडतांडव करणारी कॅरेन, आपला ‘एक्स आनंदी नाही, हे लक्षात येताच स्वतःहून अदितीला कन्व्हिन्स करण्यासाठी तडक तिच्या घरी जाऊन धडकते. नवऱ्याला सोडून जयकडे निघालेली मीरा नुसत्या फोनवर त्याला सॅनफ्रान्सिस्को प्रोजेक्ट’ मिळाल्याचे कळताच माघारी फिरते.

नव्या ‘लव्ह आज कल’मध्ये मात्र इम्तियाझ पात्रांच्या या ह्युमनायझेशनमध्ये कमी पडतो. त्याची पात्र त्यांच्या ट्रेट्सविषयी बोलतात तर खरं, पण त्यानुसार वागत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या खरेपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. उदाहरणार्थ, करियर ही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानणाऱ्या आणि त्यापुढे किमान पाच वर्षे तरी प्रेमासाठीही वेळ नसणाऱ्या झोईकडे उठसूट देवळात प्रवचनाला आल्याप्रमाणे ‘हां... करा सुरू तुमची प्रेमकथा’ म्हणत रघूसमोर ऐकत बसण्याइतका वेळ कुठून आला? किंवा लीना स्वतःहून सर्व गोष्टींची कन्सेंट देत असताना रघू बाहेरख्यालीपणा का करेल? हे व यासारखे प्रश्न निर्माण होणे मनात निर्माण होणे, हेच प्रेक्षकांचे व्यक्तिरेखामध्ये न गुंतण्याचे निदर्शक असून इम्तियाझच्या स्क्रिन प्लेच्या मर्यादा अधोरेखित करणारे आहे. उदयपूरचा अपवाद वगळता इम्तियाझ या चित्रपटातील पात्रांना त्यांच्या सराउंडिंग्जशी जोडण्यातही मागे राहातो. त्यामुळे व्यक्तिरेखांना त्यांच्या बॅक स्टोरीज मिळतच नाहीत.
या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणून चित्रपटाचा अँटी-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स दोन्ही सपाट आणि उथळ राहिले आहेत. कल आणि आज या दोन्ही कथांच्या शेवटामध्ये प्रेक्षक तटस्थ आणि त्रयस्थ राहतो. त्याला इम्तियाझ इन्वॉल्व्ह करून घेऊ शकत नसेल, तर गेल्या दोन तासांपासून जंग जंग पछाडून, आपल्याला येणारे सगळे पैंतरे वापरून आणि एकूणच आपल्या जुन्या सिनेमाला नव्या आयामासह सादर करून इम्तियाझने मिळवले तरी काय ना?
पहिल्या लव्ह आज कलमध्ये जय विमानतळावर मीराला भेटायला जातो, तेव्हा तिच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘मुझे पता था तुम आओगे, इतने साल बाद सरप्राइझ देना थोडा मुश्किल है!’ या नव्या लव्ह आज कलमध्ये एके ठिकाणी रणदीप हुडा म्हणतो, ‘अगर मैं ला सकता, तो ये सब कुछ दे कर भी, वो पुरानी स्टुपिडिटी वापस लाकर जी लेता!’ नव्या लव्ह आज कल नंतर इम्तियाझचे वर्णन करण्यासाठी हे दोन संवाद सार्थ आहेत. इतक्या वर्षांनंतर त्याची सरप्राइझ करण्याची अॅबिलिटी कमी होत चाललीय आणि त्याचबरोबत त्याच्यातील स्टुपिडिटीही... संहितेत आणि पडद्यावरही हे झाकण्याची चाललेली धडपड जेव्हा उघड होते... त्याहूनही  क्लेशदायक म्हणजे आतापर्यंत आपल्या चित्रपटातून झाकलेल्या गोष्टी उघड करणाऱ्या दिग्दर्शकाकडून जेव्हा हे होते... तेव्हा, रूमीसकट सगळ्या गोष्टी उताण्या पडतात आणि ‘जो बूंद से गयी, वो... ती जातेच!