Tuesday, August 17, 2010

स्पर्शब्रह्म

उन्हाळा. वैतागवाणा. त्यात एक मृत्युवार्ता. मित्राच्या आजोबांची. त्याच्या घराबाहेर गर्दी. टळटळीत उन्हात ताटकळत जो-तो शववाहिकेच्या प्रतीक्षेत. शववाहिका येताच गडबड सुरु. शववाहिकेसोबत आम्हीही स्मशानभूमीकडे रवाना.
तिथे पोहोचताच संबंधित लोक कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करण्यात गुंतलेले. पार्थिव सोपवून शववाहिका मार्गस्थ. पुन्हा प्रतीक्षा. थांबलेल्या सर्वांच्या चेहेऱ्यावर साधारणतः ' कधी एकदा मोकळे होतोय?', असे भाव. काही अंतरावरून चितेच्या जळण्याचा आवाज. एकूण भवतालावर शोकमय गांभीर्य पसरलेले.
एकाएकी वातावरणात अनपेक्षित बदल. अंधारून. सोसाट्याचा वारा,गडगडाट, मातीचा दरवळ इत्यादी पूर्वसूचना एखाद-दीड मिनिटात आटपून पाऊस बरसण्याच्या बेतात. तारांबळ. पार्थिवाजवळ असणारे आम्ही चौघे-पाचजण पार्थिवासाठी आडोशाची जागा शोधण्यास प्रयत्नशील. तरीही पहिला थेंब वाटेत गाठतोच! मागोमाग दुसरा-तिसरा... त्यांचा स्पर्श हवाहवासा. स्थळ-काळ विसरून चिंब भिजावेसे वाटायला लावणारा. धुंद. पण कर्तव्यदक्षता आडवी! अनुचित चुटपूट, हुरहूर, हिरमोड इत्यादी! अखेर पार्थिवासह आम्ही आडोशाला. पार्थिवावरील विस्कटलेले कापड व्यवस्थित करताना अभावितपणे नजर त्या थंड देहाच्या कपाळावरील पावसाच्या काही थेंबांवर. त्यांच्या स्पर्शाची कोणतीच अनुभूती त्या अचेतन देहावर उमटलेली नाही. आपण जिवंत असल्याची जाणीव माझ्या कपाळावरून ओघळत्या थेंबासोबत तीव्रतेने स्पर्शून जाणारी. स्पृश्यतेच्या आकलनास नवा अर्थ प्राप्त.
सरतेशेवटी मर्तिकास सुरुवात. आता बाहेर पाऊस आडवा-तिडवा कोसळतोय आणि समोर चितेवर देह जळतोय. त्या अग्नीची धग स्पर्शावाटे जाणवत्येय. पावसामुळे गारठलेल्या शरीराला उबेने लपेटू पाहत्येय...चेतनामय...