Sunday, March 10, 2024

बहरलेला अनुभाव्य अमलताश

अमलताश बघायला जाणं ही सभ्य शब्दांत सांगायचं, तर 
खोड असते. हा चित्रपट बघायचाच आहे, वगळता दुसरं कुठलंही कारण तुम्हाला थिएटरपर्यंत आणू शकत नाही. सहा वर्षांपूर्वी बनलेला हा सिनेमा (सेन्सॉर सर्टिफिकेटवर २४ डिसेंबर, २०१८ अशी तारीख आहे) इतक्या वर्षांनी प्रदर्शित होण्याची वाट शोधतो. वीस-बावीस दिवसांपूर्वी चित्रपटाचं ट्रेलर येतं, तेव्हा त्याच व्हिडिओमध्ये राहुल देशपांडे यांनी याविषयी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं केलेलं आवाहन, कालावकाश यू-ट्युब, स्पॉटिफायवर आलेले काही गाण्यांचे ऑडिओ आणि बस्स. पूर्वप्रसिद्धी म्हणावी तर इतकीच. चित्रपटात तगडी स्टारकास्ट नाही, बडं प्रॉडक्शन हाउस, वलयांकित दिग्दर्शक, तंत्रज्ञांची फौज नाही. मेनस्ट्रीम मीडिया सोडाच, पण ढीगभर पॉडकास्टर, कंटेंट क्रिएटरपैकीही कुणालाच याच्या कलावंतांना बोलतं करण्याचं सुचत नाही. अगदी चित्रपटाचं पोस्टरही एखाददुसरंच. ...आणि तरीही तो प्रदर्शित झालेल्या दिवशी, परीक्षणाची वाट न पाहता, शहरातील एकमेव शो बघण्यासाठी एका सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये मोजून इतर आठ प्रेक्षकांसह तुम्ही उपस्थित असता. तुमचं हे intuition पुढच्या एक तास ५१ मिनिटांमध्ये हा चित्रपट सार्थ ठरवतो. ट्रेलरमध्ये चाहूल लागलेला अनुभव बहाव्याच्या सड्याइतका भरभरून तुमच्या पारड्यात टाकतो. तृप्त करतो.

चित्रपटाची सुरुवातीची फ्रेम आहे एका रॉक कॉन्सर्टची. ते दृश्य संपताच दहा वर्षानंतर त्या रॉक बँडमधला एकजण पुण्याच्या एका टेकडीवरून सूर्योदयाचा फोटो काढताना दिसतो. या आणि यानंतरच्या अवघ्या काही सीन्समध्येच श्राव्य आणि दृक अर्थांनी हा चित्रपट आपल्याला ऑन-बोर्ड घेतो आणि असाच अधिकाधिक involve करून घेत पुढे जातो. रॉकस्टार होण्याचं स्वप्नं काही कारणास्तव अधुरं राहिलेला राहुल (राहुल देशपांडे) आणि एकट्या राहणाऱ्या आज्जीला आपल्यासोबत कॅनडाला घेऊन जाण्याकरिता काही दिवस भारतात आलेली कीर्ती (पल्लवी परांजपे) या दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखांचा प्रवास ही कथा मांडते. लेखक-दिग्दर्शक सुहास देसले (सहलेखक मयुरेश वाघ) कथेवर काटेकोर पकडीचा अट्टहास न बाळगता ती सैलसर हाताळतात. पात्रांना नैसर्गिकरीत्या वागू देतात, त्यांना बंदिस्त न करता फॉलो करतात आणि परिणामी प्रसंगांची सहजता जपतात. बहुधा त्यामुळेच, आजही तो ताजा, टवटवीत वाटतो. एखाद्या निवांतवेळी गप्पा मारताना, अरे त्या याची काय खबरबात रे हल्ली?” असं विचारल्यावर समोरच्यानं ऐसपैस सांगायला सुरुवात करावी आणि आपण मागे रेलून ऐकत राहावं, तसा हा चित्रपट तब्येतीत उलगडत जातो.

तरलता हे अमलताशचं सर्वांत ठळक वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे. वेशभूषांच्या रंगसंगतींपासून ते प्रकाशयोजनेपर्यंत सर्वत्र या तरलतेचं भान आढळतं. म्हणूनच, राहुल आणि कीर्तीमध्ये प्रेमबंध निर्माण होत असल्याचं दाखवण्यासाठी चित्रपट आउट ऑफ दि वे जाऊन काही करत नाही. त्या दोघांमधले संवाद flirtatious होत नाहीत, तर वागण्यातला मोकळेपणा वाढतो. एकमेकांसोबतच्या सहवासातील सुरक्षितता दिसते. (ही जवळीक टिपणाऱ्या शॉट्सचं मोंताज हे चित्रपटाच्या सर्वांत सुंदर दृश्यांपैकी एक आहे.) राहुल देशपांडे आणि पल्लवी परांजपे या दोघांनीही त्यांचा भूमिका समरसून निभावल्या आहेत. राहुल आणि कीर्तीप्रमाणेच कथेतील राहुलची बहीण दीप्ती (दीप्ती माटे), भाची डिंपल (त्रिशा कुंटे), मित्र, कीर्तीची आज्जी (प्रतिभा पाध्ये) या व्यक्तिरेखांबाबतही दिग्दर्शक आणि अभिनेते-अभिनेत्रींनी ही स्वाभाविकता जपली आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्तिरेखा ओव्हर दि टॉप न होता कथेचा भाग बनून मिसळते.



संगीत हा या कथेतील जवळपास सर्व पात्रांना एकमेकांशी जोडणारा समाईक दुवा आहे. अगदी वाद्य दुरुस्तीच्या प्रक्रिया, ट्युनिंगपासून ते jamming sessions पर्यंत संगीत सर्वत्र व्यापून राहिलं आहे. Soft rock, भावगीतं आणि उपशास्त्रीय अशा विविध genresना या चित्रपटाच्या संगीतामध्ये सामावून घेण्यात आलं आहे. संगीत दिग्दर्शक भूषण माटे, पार्श्वसंगीतकार अमोल धाडफळे आणि राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, दीप्ती माटे या गायक-गायिकांनी या चित्रपटाच्या ज्युक-बॉक्सला साद्यंत संग्राह्य बनवलंय.

चित्रपटशास्त्रामध्ये मिझाँ-सेन् (mise-en-scene) ही संकल्पना वारंवार चर्चिली जाते. कथा जिथे घडते ते अवकाश व त्यामध्ये अंतर्भूत सर्वकाही, असा तिचा ढोबळ अर्थ आहे. मात्र, या व्याख्येचं प्रात्यक्षिक अमलताशमध्ये पाहायला मिळतं. ऋषिकेश तांबे यांच्या कॅमेऱ्यानं टिपलेलं पुणं हे आजवर चित्रपटात दिसलेलं सर्वांत रिलेटेबल पुणं आहे. टेकड्यांवरून दिसणारे सूर्योदय-सूर्यास्त, सकाळ-सकाळी झाडल्यानंतरचे स्वच्छ रस्ते, मधल्या पॅसेजमध्ये टेबलं टाकून चालणारी हॉटेलं, तिथले काउंटरवरच मांडी घालून उकळता चहा ग्लासांत ओतणारे मालक, दोन इमारतींच्या खाचीमध्ये शिल्लक राहिलेले वाडे, मंडईतले भाजीवाले, पांढुरक्या पीठगिरण्या, कुस्तीच्या आखाड्यातील तिरपे प्रकाशझरोके, पदपथ उद्यानांमधील मातीच्या वाटा, रात्री उशीराचे मोकळे रस्ते, बोचरी थंडी हे सगळं आजुबाजूला वावरणारं विश्व आहे आणि हा चित्रपट अक्षरशः त्या भवतालात विरघळलाय.   

इतकं सौंदर्य लेऊन हा चित्रपट शेवटापर्यंत पोहोचतो, तेव्हा आपण त्रयस्थ राहत नाही. आपण पात्रांना जज न करता समजून घेतो. त्यांचे सहप्रवासी बनतो. अमलताशमध्ये नाट्यमय कलाटण्या नाहीत, धक्कातंत्राचा अवलंब नाही, चटकदार संवाद नाहीत, कोणी साधं वरच्या पट्टीत बोलतही नाही. चित्रपट आपल्याला प्रभावित, थक्क करायच्या मोडमध्ये जात नाही. तरीही एक सघन, संवेदनशील अनुभूती देण्यात अमलताश कमालीचा यशस्वी ठरतो. चित्रपट काही ठिकाणी तोकडा जरूर आहे. काही ताणेबाणे विणण्यात तो जास्त रेंगाळतो, राहुलच्या आर्थिक स्थितीबाबत तो संदिग्धता व विसंगती बाळगतो. काही संवादांमधील कृत्रिमता, एखाद-दुसऱ्या प्रसंगांत कलाकारांचा नवखेपणा, शेंगदाण्याचा खूपच रिपिटिटिव्ह विनोद आदी त्रुटी जमेत धरल्या, तरी त्यामुळे अनुभव उणावत नाही. अमलताशचं शांत सानिध्य अबाधित राहतं.

पर्सनली, एकाच आठवड्यात अगोदर लापता लेडीज् आणि त्यापाठोपाठ अमलताश थिएटरमध्ये बघताना प्रेक्षक म्हणून दुर्मिळ विजयाची भावना होती. सर्वत्र भव्य-दिव्यचा सोस वाढत असताना, आक्रस्ताळेपणा नॉर्मल समजला जात असताना, सर्वांत टिपेचा सूर खरा मानला जाताना, मिळकतीच्या आकड्यांवर गुणवत्ता जोखली जात असताना, आपल्याला पाहावेसे वाटणारे सिनेमे बनणारच नाहीत का आता?’ या प्रश्नाचे उत्तर फारसे आश्वासक नसताना, अमलताशसारखा निर्मम सूर कोणीतरी आळवतंय, संयतपणे मनापासून काहीतरी सांगतंय, हे पाहणं हृद्य आहे. आपल्याशी वेव्हलेंथ जुळणारं कोणीतरी, कुठेतरी नवी सृजननिर्मिती करत असल्याचा दिलासा आहे, तोवर आयुष्य सुंदर आहे!!


(चित्रपटाच्या तंत्रज्ञांची नावं IMDb वरून घेतली आहेत. त्यामध्ये काही चुका असल्यास क्षमस्व.)


Tuesday, June 7, 2022

'केके’ पाहिजे यार!


केके जाऊन आज बरोबर आठवडा झाला. ऐन रखरखीत उन्हाळ्यात तापत ठेवून केके गेला, आणि तो दाह शांतावणाऱ्या सरी अजूनही बरसलेल्या नाहीत. एखादं अनोळखी गाणं प्रथमच कानी पडल्यावर हमखास त्याचा गायक ओळखता येईल, असा आणखी एक आवाज कमी झाला; आणि त्या आवाजाची अनोळखी गाणी यापुढे अशीच कानावर पडण्याची शक्यताही. केकेच्या जाण्याच्या बातमीच्या धक्क्याइतकाच त्या बातमीतील त्याच्या वयाचा उल्लेखही धक्कादायक होता. केकेचं वय 53 वर्षे होतं, हे पटूच शकत नाही. आपल्यासारख्या कित्येकांसाठी तो सदैव विशी-तिशीतलाच राहिला. किंबहुना, आजही स्वतःला तरुण समजण्यासाठी आपण मनात गिरवत असलेल्या मापदंडांमध्ये (पॅरामीटर्स) केकेच्या गाण्यांची पडणारी भुरळ ही अढळस्थान पटकावून आहे.

गेल्या आठवड्याभरात केकेविषयी वाचत असताना एके ठिकाणी केकेच्या गायनात हिंदी चित्रपटसृष्टीतील अगोदरच्या कुठल्याही गायकाचे हिस्टॉरिकल ट्रेसेस सापडत नसल्याचे विधान होते. हे मान्य किंवा अमान्य करण्याइतका काही व्यासंग नाही. मात्र, हेच विधान जर थोडसं फिरवलं आपल्या वैयक्तिक हिस्ट्रीमध्ये केकेचे ट्रेसेस जागोजागी, अगदी चित्रपटगीतांपलीकडेही सापडतील. कधी तो अपडी पोडे’ म्हणत आपल्या जल्लोषी नाचण्यात सहभागी झालेला असतो, तर कधी जब घर की रौनक बढानी हो म्हणत आपल्याला नेरोलॅकची जाहिरात गुणगुणायला लावत असतो.

आमच्यासारख्या क्रिकेटप्रेमींसाठी तर केकेचा परिचय हा तडप तडपच्याही थोडा अगोदरचा आहे. 1999 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा त्यावेळचा प्रमुख प्रायोजक असलेल्या हिरो होंडाने केकेच्या आवाजात जोश ऑफ इंडिया हे थीम साँग तयार केलं होतं. एकतर शाळेच्या उन्हाळी सुट्टीतला वर्ल्ड कप आणि त्यात त्याचं असं जोशपूर्ण थीम साँग वगैरे... ते गाणं तर तोंडपाठ होतंच, पण त्यातल्या कुठल्या पंक्तीला कुठला खेळाडू हातात भारताचा झेंडा धरून दिसणार आहे, हे आजही थोड्याफार फरकाने लक्षात आहे. त्या गाण्यामध्ये केकेचं पहिलं दर्शन, श्रवण झालं, तेव्हा अर्थातच एखाद्या गायकाचं गारूड होण्याचं वय नव्हतं. नंतरच्या काळातही केकेला कधी कवटाळून बसल्याचं आठवत नाही. आवडता प्राणीआवडते लेखकच्या धर्तीवर आवडता गायक हा निबंध अभ्यासक्रमात कधीच आला नसल्यामुळे सुदैवाने तो चॉइस करावा लागला नाही. पण, पसंतीच्या काही आघाडीच्या आवाजांमध्ये एक केकेचा नेहमीच होता, आहे. त्याच्या बंदा ये बिन्दास हैचा अवखळपणा आहे, कोई कहे, कहता रहेचा उत्साही आत्मविश्वास आहे, आवारापनची विमनस्कता आहे, जिना क्या जीवन से हारकेचा निर्धार आहे, ले चलेचा आधार आहे, आशांए खिले दिल कीचा आशावाद आहे, 'आंखोमे तेरी'ची स्वप्नील तरलता आहे... आणखीही असं बरंच काही आहे.

केकेने गायलेल्या गाण्यांची हीच तर खासियत आहे. त्यातल्या अनेक गाण्यांची ना व्हिज्युअल्स माहीत आहेत, ना ती ज्यांच्यावर चित्रित झालीएत, ते नायक-नायिका. बरेचदा तर ते चित्रपटही पाहिलेले नाहीएत. त्या अर्थाने प्रसिद्ध होण्यासाठी कधीही दृक् माध्यमांचा टेकू घ्यावा न लागलेल्या मोजक्या गायकांपैकी केके हा एक होता. उलटपक्षी, त्याच्याच गायकीने इम्रान हाश्मीला करियरच्या पहिल्या दशकात बऱ्यापैकी हात दिलाय. (यात त्याच्यासोबत आतिफ अस्लम आणि काहीअंशी कुणाल गांजावालाही आहेत.) आपल्या मनात चिरंतन घर करून राहिलेतते केकेच्या गाण्यातले मूड्स. आणि ते इतके स्ट्राँग आहेत की आजही ते गाणं ऐकलं, तरी नकळत ते मूड्स आपला ताबा घेतात. पटत नसेल, तर आत्ताच्या आता हे वाचणं थांबवा आणि याद आएंगे ये पल’ लावून बघा, सहा मिनिटे चार सेकंदांनी काय होतं ते.


नॉस्टॅल्जियासाठी मराठीमध्ये स्मरणरमणीयता आणि गतकातरता असे दोन प्रतिशब्द वापरता येतात. केकेच्या गायनात मात्र, या दोन्ही शब्दांचा अर्क ओतप्रोत उतरलाय. नव्वदच्या दशकामध्ये हिंदी चित्रपट संगीतात जे स्थान उदित नारायण आणि कुमार सानूचे होते, तेच स्थान 2000 च्या दशकामध्ये केके आणि शानने कमावले होते. अपवाद वगळता कोणताही चांगला अल्बम त्यांच्या गाण्याशिवाय पूर्ण व्हायचा नाही. केकेचा आवाज आणि त्या आवाजात गाणं म्हणणारा नायक हे दोन्ही शहरी आहेत. त्यांची हिंदी प्रमाण आहे आणि तिला असलीच तर थोडीशी इंग्रजीची झाक आहे. केकेचं एखादं पंजाबी धाटणीचं, ग्रामीण बाजाचं किंवा भोजपुरी, अवधी, हरियाणवी तत्सम कुठलाही लहेजा असणारं गाणं पटकन आठवतंयतसेच, डोक्याला ताण देऊनही त्याचं इतिहासकालीन किंवा विद्रोही गाणंसुद्धा समोर येत नाही. याअर्थी, केकेचा आवाज culture-neutral होता; वर्तमानकालीन, पोस्टमॉडर्न होता; बॅगेजेस कॅरी न करणारा, मोकळा होता. आपल्याशी त्याचा सहजासहजी कनेक्ट जुळण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. मग, आता याला कोणी जर पलायनवादी, पठडीबाज वगैरे लेबलं लावत असेल, तर go ahead, who cares?

केके त्या काळाचं, त्या atmosphereचं प्रॉडक्ट आहे. त्याच्याकडे असं आयसोलेशनमध्ये नाही पाहता येत. म्हणजे, केकेची संपूर्ण कारकीर्द घडणे आणि त्यावेळी ऐकायला आपले कान उपलब्ध, आसुसलेले असणे, हा एकीकडे योगायोग असला, तरी it’s a part of the larger picture. ग्लोबलायझेशनच्या पहिल्या दशकामध्ये भारतात जे काही घडलं, त्याची फळं दुसऱ्या दशकात अलगद आपल्या झोळीत येऊन पडली. केकेही त्याचीच देन आहे. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये भारतात जी प्रायव्हेट टीव्ही चॅनेल्स वाढली, त्यामध्ये म्युझिक चॅनेल्सची संख्या लक्षणीय होती. त्यांचा टार्गेटेड ऑडिअन्स आणि त्यांना अॅड रेव्हेन्यू पुरवणाऱ्या जाहिरातदारांचा टार्गेटेड कंझ्युमर हा अर्थातच युवावर्ग होता. चित्रपट संगीताचा पुरवठा या चॅनेलची भूक भागवण्यास पुरा पडत नव्हता. दुसरीकडे कॅसेट्ससोबत ध्वनीमुद्रणविश्वात सीडी हे नवं प्रकरण दाखल झालं होतं आणि त्याच्या भविष्यातील व्यावसायिक शक्यता लक्षात घेता म्युझिक रेकॉर्डिंग कंपन्यांनाही विस्ताराची आस होतीच. याच दशकाच्या अखेरीस भारतात खासगी रेडिओ एफएम वाहिन्यांना परवानगी मिळाली. अवघ्या काही वर्षांमध्ये भारतीय पॉप संगीताची वेगाने भरभराट होण्यामागे ही सर्व पार्श्वभूमी होती. त्यानिमित्ताने, आशा भोसले, सुलतान खान, हरिहरन, शुभा मुदगल यांसारख्या प्रस्थापितांबरोबरच लेस्ले ल्युइस, शंकर-एहसान-लॉय, केके, मोहित चौहान, शान, सलीम-सुलेमान यांसारख्या उदयोन्मुख टॅलेंटना हे नवे अवकाश उपलब्ध झाले. त्यातले सकस होते, ते टिकले, कालांतराने त्यांचा प्रवेश हिंदी चित्रपट संगीतामध्येही झाला.

भारतातील बाजारपेठेचाही विस्तार याला समांतर होता. उत्पादनं वाढत होती, तशीच उत्पादनांची जाहिरात करण्याची गरजही. अॅडव्हर्टायझिंग, मार्केटिंग या विभागांचे महत्त्व, बजेट वाढत होते आणि त्याची परिणती भारतामधील सर्वच माध्यमांतील जाहिरातींचा चेहेरामोहरा आमुलाग्र बदलण्यात झाली. भारतीय टीव्हीवरच्या त्या दशकाच्या सुरुवातीच्या आणि अखेरच्या जाहिराती पाहिल्यास निर्मितीमूल्यांमधील हा फरक ठळकपणे जाणवतो. अॅड जिंगल्स हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक होता. टीव्हीवरसुद्धा सीरियल्स वाढत गेल्या, तसे त्यांचे टायटल ट्रॅक गाणारे गायक-गायिकाही. या सगळ्यात केके at the right time, at the right place होता, म्हणून बरं. तो तसा नसता तर आपल्याला जस्ट मोहोब्बतचं चिन चिनाके बबला बू आणि हिप हिप हुर्रेचं शीर्षक गीत मिळाले नसते.

या सगळ्याचा एक पैलू तंत्रज्ञानाचाही आहे. रेकॉर्डिंग तंत्रज्ञानामध्ये अॅनालॉग टू डिजिटल, मॅन्युअल टू अॅटोमेटेड हे स्थित्यंतर घडले. त्याजोडीला, साउंड मिक्सिंग, इन्स्ट्रूमेंटेशन (पंचमदांनी सत्ते पे सत्तामध्ये बॅकग्राउंड स्कोअरसाठी चक्क गुळण्यांचा आवाज वापरला होता किंवा सामने ये कौन आया’मधील तालासाठी मडक्यावर चामडं घट्ट बांधलं होतं, तशाप्रकारच्या सगळ्या गरजा आता तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण होऊ शकणार होत्या), व्हॉइस फिल्टर्स (गायक नसणाऱ्या अभिनेत्यांनी गाणी म्हणण्याचा ट्रेंडही याच काळात वाढीस लागला)  आदी अंगांबाबतही बरीच प्रगती झाली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम संगीताची टोनॅलिटी बदलण्यावर झाला. नव्या सहस्रकाच्या अलीकडे-पलीकडे चित्रपटसृष्टीत दाखल झालेले इस्माइल दरबार, विशाल-शेखर, सलीम-सुलेमान, प्रीतम (पूर्वाश्रमीचे जीत-प्रीतम) आदी संगीतकार आणि नवे अल्बम्स, लाइव्ह परफॉर्म करणारे पॉप म्युझिक बँड (यात केके-लेस्लेचा पल आलाच) यांचे संगीत हे या नव्या टोनॅलिटीचा परिपाक होते. मल्टिप्लेक्सच्या उदयासह आलेल्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी आपल्या नव्या चित्रपटांसाठी या संगीतकारांना नवीन साउंड निर्माण करण्याच्या सिच्युएशन्स दिल्या. प्रत्येक दशकात स्वतःला जणू रिबूट’ करून अधिकच अद्ययावत होणाऱ्या गुलजार, जावेद अख्तर यांच्यासह इर्शाद कामिल, अन्विता दत्त, स्वानंद किरकिरे, कुमार यांनी त्यांना शब्द पुरवले आणि केकेसारख्या काहींनी स्वरसाज.    

तंत्रज्ञान हे काही फक्त निर्मितीच्याच स्तरावर बदललं नव्हतं. आमचं केकेशी नातं जुळलं, तेव्हा लूपवर ऐकणं/बघणं ही संज्ञा प्रचलित व्हायची होती अजून. एखादं गाणं पुन्हा ऐकायचं असल्यास कॅसेट रिवाइंड करावी लागायची आणि बघायचं असल्यास टीव्हीवर ते पुन्हा लागेल, या अपेक्षेने मधला वेळ चॅनेल सर्फिंग करत टीव्ही पाहात बसावं लागायचं. अंगावरील सॅटिन शर्टच्या मॅचिंग रंगाचा बॅकग्राउंड आणि हातातून तोच रंग सोडत असलेल्या केकेच्या यारोंसारख्या गाण्यांचे व्हिडिओ आम्ही असल्या लूपवर कितीवेळा बघितलेत, त्याचे केविलवाणे पुरावे आमच्या त्या त्या वर्षीच्या प्रगतिपुस्तकांत आजही दफन आहेत.

मग एपी-3, एमपी-5 आल्या आणि एकाचवेळी वीस-पंचवीस अल्बमची गाणी ऐकण्याची सोय झाली. उगाच  आणि बी साइडला दोन वेगवेगळ्या चित्रपटांची निवडक गाणी असणाऱ्या कॅसेट्समधून आपल्याला हवं ते कॉम्बिनेशन शोधण्याची आणि त्यात हवी ती गाणी आहेत का, हे तपासण्याची गरज उरली नाही. मग आपापले लॅपटॉप आले. एक फोल्डर फक्त गाण्यांसाठी ठेवता यायला लागला. कानात इअरप्लग घालून मोबाइलवर जाता-येता रेडिओ ऐकता येऊ लागला. काही वर्षांनी तर, मेमरी कार्ड स्लॉटही आला. एव्हाना इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करण्याचीही सुविधा उपलब्ध झाली होती. मग, यू ट्युबवर हवे ते व्हिडिओही पाहिजे तेव्हा पाहताही येऊ लागले. स्मार्टफोन, फ्री डेटा आणि गाना’, ‘सावनस्पॉटिफाय इत्यादी अॅपनी तर या सगळ्याचीच गरज संपवली.

गेलं दशक मागणी-पुरवठ्याचा इम्बॅलन्सचं होतं. इतकं काही, इतक्या वेगाने कानावरून झपकन जात होतं की रवंथ करण्याची सवय मागे पडली. एखादं गाणं आवडलंय, पुढचे काही आठवडे तुमचंच होऊन राहिलंय, वास्तव आयुष्यात तसा काही अनुभव आला की आपसूक तेच गाणं तुमच्या ओठांवर-मनात येतंय, तुम्ही इतरांना ते ऐकण्याची शिफारस करताय, त्यांचे अभिप्राय विचारताय, असं झालंच नाही अलीकडे. गाणी बनवणारे संगीतकार, लिहिणारे गीतकार हे माहीतच नसतात. अरिजित, पॅपॉन, श्रेया, सुनिधीसारखे अपवाद वगळल्यास गायक-गायिकांची नावंही नाही ओळखता येत आणि त्याचा कमीपणा वाटणंही बंद झालंय. सचेत-परंपरा ही दोन वेगवेगळी माणसं आहेत आणि अर्को प्राव्हो मुखर्जी हे एकाच माणसाचं नाव आहे, हे मी अजून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

केकेची गाणी कमी होत जाणं हेसुद्धा याचाच एक भाग असावं, कदाचित. अचानक कधी तो पिया आए ना किंवा तू जो मिलाद्वारे भेटायचा, तेव्हा वाटायचं अरे कुठे असतोस मित्रा हल्लीकिती दिवसांनी येतोयस? कसं चाललंय तुझं?’ त्यालाही काही वर्षं उलटून गेली, हे आता कळतंय. कधीतरी, अगोदरचा आठवडा धावपळीचा गेला असेल, मनासारखा गेला नसेल, तर वीकली ऑफला (आमच्या नोकरीत हॉलिडे नसायचा. आठवड्यातल्या ज्या दिवशी सुट्टी तो वीकली ऑफ) कुठलाही प्लॅन न ठरवता घरीच बसावं, विनॅम्प प्लेअरवर आपल्या आवडत्या गाण्यांची लांबलचक प्ले-लिस्ट सेट करावी, आलटून-पालटून चहा-कॉफीचे कप, मग संपवावेत आणि कपड्यांना घड्या घालणे, नखं कापण्यासारखी फुटकळ कामं सोडून दुसरं काही करू नये. अशा माहोलमध्ये जेव्हा बऱ्याच वेळाने अलविदा’ किंवा हम तो हारे, माहिया रे’ गाताना केकेचा सूर टिपेला पोहोचतो आणि तिथून पुन्हा समेवर येतो ना, तेव्हा काय होतं, ते असं सांगता नाही येत. तशी एक्स्प्रेशन फेसबुकच्या हॅपिनेस इज...’ या डुडललाही नाही शोधता आलेली. इथून पुढे त्या तृप्तीला एक बोचरी किनार असेल मात्र.   

केकेबाबत आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे केकेविषयी त्याच्या गायकीपलीकडे निदान मला तरी काहीही माहीत नव्हतं. सुरुवातीच्या काळातील कॅसेटच्या रॅपरवर त्याचा उल्लेख कृष्णकुमार असा होता आणि मी केके हे याच नावाचे संक्षिप्त रूप मानलं होतं. त्याचं आडनाव कुन्नथ असल्याचं मला थेट आता समजतंय. पण, ते कपूर, कनोजिया किंवा कांत आहे, असं समजलं असतं, तरी त्याचं आश्चर्य वाटलं नसतं, इतका केके गायनापलीकडील व्यक्ती म्हणून अपरिचित होता. त्याच्याविषयी कधी कुठले वाद झाले नाहीत, त्याने अवॉर्ड फंक्शनबद्दल नापसंती व्यक्त केली नाही, नेपोटिझम, ग्रुपिझमबद्दल मतं मांडली नाहीत, वादग्रस्त ट्विट केली नाहीत की मजेशीर रील्स केली नाहीत. त्याचा ना एअरपोर्ट लूक प्रसिद्ध झाला, ना त्याने अभिनय केला, ना नृत्य. ना तो बिग बॉससारख्या शोमध्ये कधी कंटेस्टंट बनला, ना नंतर फक्त मीम्स म्हणूनच वापर होण्यासारख्या एक्स्प्रेशन देणारा रिअलिटी शोमधला जज. आजकालच्या प्रसिद्धीलोलूप वातावरणात आणि या वातावरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या इंडस्ट्रीमध्ये वावरतानाही त्याने ही प्रसिद्धीपराङमुखता कशी जमवली असेल, तोच जाणे. आपल्यासाठी केके फक्त त्याच गोष्टीमुळे आठवणीत राहणार आहे, ज्यासाठी त्याला आठवणीत ठेवलं जायला हवं – त्याचा आवाज. उद्या जगलो वाचलो, तर आपण त्रेपन्न वर्षांचे होऊ तेव्हाही आपल्या मनातल्या विशी-तिशीत केके तितक्याच तारुण्यासह गात असेल.

शेवटी, दिल चाहता हैमध्ये सिद्धार्थ दीपाला सांगतो, ते तत्त्वज्ञान मान्य करावंच लागतं. कितीही गच्च मूठ आवळली, तरी बोटांच्या मधून रेती निसटून जाणारच असते. केकेबाबत तर ती मूठ कधी कोणी आवळलेलीही नव्हती. उघड्या तळव्यावर शिल्लक राहिलेल्या वाळूत आम्ही समाधान मानून घेत होतो. त्यामुळे ती आपसूक निसटून गेली नसतीच कधी. पण, ती जणू हातावर फट्कन मारून खाली पाडण्यात आली, भणाणत्या वाऱ्याने उडवून लावण्यात आली, क्षणार्धात नाहीशी करण्यात आली. आणि आता ना ती मूठ आवळण्याची संधी राहिली, ना नव्याने रेती वेचण्याची मुभा. केकेची जुनीच गाणी पुनःपुन्हा ऐकताना ही खंत कायम पोखरत राहील, एवढंच फक्त.

 (छायाचित्र सौजन्य - वृत्तसंस्था)

Tuesday, June 8, 2021

...तो कप्तान अझर आहे!

'बऱ्याच दिवसांत क्रिकेट खेळलो नाही रे... या रविवारचा काय प्लॅन आहेजमायचं का खेळायला?... तो हा कुठे आहेत्यालाही बोलावून बघ आपल्या ह्याला तू विचारशील की मी विचारू?... अमूक तो पण आहे ना रे सध्या इथेच?... सगळ्यांना गोळा करूमजा येईल…’

महंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे बरेचसे सामने बघताना मला बॅकएंडला उपरोक्त चर्चा रंगल्याचा भास होतो. संघातील कोणत्याही खेळाडूची कुचेष्टा करण्याचा येथे अजिबात हेतू नाही. या संघातील अनेकांची गुणवत्ता वादातीत होती. पण तरीही पराभव पचवायचे आणि विजयासाठी संयम बाळगायचे इतके बाळकडू या संघाने लहानपणापासून पाजलेत ना... की बस्स! त्यामुळेच असेल कदाचित, पण जेव्हा हा संघ जिंकायचा त्या दिवशी कॉमेंट्रेटरच्या इंडिया वन दि मॅच’ या चार शब्दांचे मोल सॅलरी हॅज बिन क्रेडिटेड’ या शब्दांइतकेच असायचे. ८ जून १९९९ हा अशाच दिवसांपैकी एक.

त्या दिवशी भारताने ९९ च्या वर्ल्ड कपमधील सुपर सिक्स फेरीत पाकिस्तानला धूळ चारली होती. अझरच्या नेतृत्वाखालील भारताने मिळवलेला बहुदा हा अखेरचा संस्मरणीय विजय. आणि तोही कुठल्या वेळीतर कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर ठाकले असताना आणि तिथे अद्याप भारताचे बॅकफूटवरून फ्रंटफूटवर येण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असताना. एरवी तसा निराशाजनकच गेलेल्या या वर्ल्ड कपमधून एव्हाना भारताची एक्झिट जवळपास निश्चित झाली होती. साखळी फेरीत झिम्बाब्वेकडून पराभवाची नामुष्की ओढावलेल्या भारतीय संघाला सुपर सिक्समधील उर्वरित दोन्ही सामनेही गमवावे लागले होते. परंतु, त्या दिवशीच्या भारताच्या विजयाने वर्ल्ड कपमधील बाकीचे शल्य बरेचसे कमी केले. अपुन एकइच मारा...च्या थाटात संघ सन्मानाने स्पर्धेतून बाहेर पडला. काहीही लॉजिक नसताना आता कारगिलमध्येही भारताचाच तिरंगा फडकणार, हा विश्वास त्या विजयाने पुन्हा रुजवला.        

संख्येने खूप नसले, तरी अझरच्या टीमने असे साजरे करण्याजोगे काही मौल्यवान क्षण दिले आहेत. अझर हा आम्ही पाहिलेला भारताचा पहिला कर्णधार. अगदी क्रिकेट कळायच्या आधीपासून शाळेतल्या जी. के.च्या फळ्यावर भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्यासह भारताचा कर्णधार म्हणून महंमद अझरुद्दीनचे नाव वाचले होते. सचिनचे अल्पकालीन नेतृत्व आणि जडेजाच्या बदली कर्णधारपदाचा अपवाद वगळता आमच्यासमोर तरी अझर हा अखेरपर्यंत कर्णधार म्हणूनच वावरला. येथे फोकस अझरच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धावर आहे. कपिल देवसह त्याच्या संघातील दिलीप वेंगसरकर, के. श्रीकांत, रवी शास्त्री आदी बऱ्यापैकी खेळाडू तोपर्यंत निवृत्त झाले होते. उरला होता अझर आणि सोबतीला अनप्रेडिक्टेबल खेळाडूंचा भरणा असणारा भारतीय संघ.

बाप रेअगदी सौम्यपणे मांडायचे झाले, तरी काय एक-एक लोकोत्तर नमुने होते या संघात. कधीतरीच खेळायला येणारे आशिष कपूर, राहुल संघवी, सदागोपन रमेश वगैरे तर सोडूनच देऊ. पण, नियमित खेळाडूंच्या बाबतीतही अझरचा रवैया एखाद्या कनवाळू बॉसप्रमाणे (खरेच असे कोणी असतील तर!) होता. खेळाडूंना त्यांच्या मानद नोकरीच्या ठिकाणी नसेल, इतकी जॉब सिक्युरिटी अझरच्या टीममध्ये होती. त्यामुळेच, सुनील जोशी एखाद्या वेळी ६ धावांत ५ विकेट घेऊन पुढचे कित्येक सामने त्या पुण्याईवर संघात राहू शकायचा. सौरव गांगुलीने वन-डेत सलामीवीर म्हणून पहिले अर्धशतक झळकावताना १०४ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या होत्या, होय वन-डेमध्येचराहुल द्रविड तर १९९९ च्या वर्ल्ड कपपर्यंत वन-डे संघातील कसोटीपटू म्हणूनच ओळखला जात होता. लक्ष्मणच्याही सुरुवातीच्या अपयशांची आकडेवारी काही कमी नव्हती. कुंबळेचा चेंडू ऑफ किंवा लेग कुठेच वळत नसल्याने त्याला मिडल स्पिनर म्हटलं जायचं. आणि हे तर फक्त कामगिरीवर बोट ठेवता येण्यासारखे सभ्य खेळाडू होते. बाकी, हरभजन सिंगने वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण करताच ऐन मैदानावर थेट रिकी पाँटिंगशी पंगा घेतला होता. सिद्धू वरचेवर कोणानाकोणाशी तरी भांडतच असायचा. जडेजा, कांबळी हे कित्येकदा नवनवीन गॉगल्स आणि हेअरस्टाइल्समुळेच चर्चेत असायचे. श्रीनाथ फिल्ड सेटिंगवरून बऱ्याचदा कर्णधारावरच डाफरायचा. आणि या सगळ्यांना सांभाळून घेत अझर आपल्या जुनाट टोपीसह मैदानावर थंड उभा असायचा. केवळ सहज म्हणून वरीलपैकी कुठल्याही कृतीला विद्यमान भारतीय कर्णधाराची प्रतिक्रिया इमॅजिन करून पाहा, म्हणजे अझरच्या शांतपणाची महती पटेल.

खेळाडू म्हणून तर अझरच्या गुणवत्तेची नव्याने चर्चा करणंही फिजूल आहे. जे त्याच्याकडे होतं, ते फक्त त्याच्याकडेच होतं. त्याच्यासारखी दुसरी मनगटं, त्याचे फ्लिक्स, लेग ग्लान्स, ऑन ड्राइव्ह आणि थ्रो शोधणे म्हणजे अमरिष पुरीचा आवाज, महंमद रफीचा स्वर आणि पुलं किंवा चॅप्लिनच्या विनोदाला पर्याय शोधण्यासारखं आहे. संघ अडचणीत असताना धावून येणाऱ्या अझरने वर उल्लेख केलेल्या सामन्यातही ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. कसोटी व वन-डेतील वेगवान शतकांंसह (अनुक्रमे ७४ व ६२ चेंडू) बरेच विक्रमही नावावर होते, तरीही भारतीय बॅटिंग लिजंड्सबद्दल बोलताना क्वचितच कोणी अझरचे नाव घेत असेल. अझरनेही स्वतःहून कधी तसा महान फलंदाज असल्याचा आव आणला नाही. शतकानंतरही तो जणू अनिच्छेनेच बॅट उंचवायचा. याउप्पर, अझर आणि सचिनमध्ये त्या काळात सुप्त स्पर्धा असल्याची चर्चाही रंगत असे. १९९६ च्या वर्ल्ड कपनंतर सचिनकडे कर्णधारपद आल्यावर या चर्चेला आणखीच जोर चढला. सचिनचे त्यावेळचे वय बघता तो अझरला मागे टाकणार आहे, हे सांगण्यासाठी क्रिकेटतज्ज्ञाची आवश्यकता नव्हती. तरीही कर्णधारपदी परतल्यानंतर अझरने प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे त्याला कुठेही आडकाठी केली नाहीसध्या फॉर्मात असताना रोहित शर्माला ज्याप्रकारे दर दोन-तीन सामन्यांआड विश्रांती देण्यात येते, त्याच्याशी तुलना केल्यास मला काय म्हणायचेय, हे तुम्हाला समजेल.        

अझरच्या संघाबाबत केवळ खेळाडूंच्या तऱ्हा हाच एकमेव इश्यू नव्हता. विशेषतः वन-डेमध्ये क्रिकेटच्या प्रोफॅशनॅलिझमची नवी आव्हानेही इच्छा असो वा नसो, संघावर येऊन आदळत होती. केवळ गुणवान खेळाडू संघात असणे आता पुरेसे ठरणार नव्हते. त्यासाठी योग्य खेळाडूंची मोट बांधून त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेणे, प्रत्येकाची संघातील भूमिका निश्चित करणे, बेंच स्ट्रेंंथ बळकट करणे, व्यूहरचनात्मक नियोजनाला अंमलबजावणीची जोड देणे (स्ट्रेटेजिक प्लॅनिंग-एक्झिक्युशन चेन) आदी गोष्टी निर्णायक ठरणार होत्या. त्या काळी अर्जुन रंणतुगाला त्या जमल्या, मग स्टीव्ह वॉला जमल्या. कालांतराने गांगुलीनेही याच गोष्टी जमवून यश खेचून आणले. अझर मात्र आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत हा कोड क्रॅक करू शकला नाही, हे मान्य करावेच लागेल.

भारतात सिनेमा आणि क्रिकेट हे समाजमनावर सर्वदूर परिणाम करणारे दोन 'सी' मानले जातात. यांपैकी सिनेमाला अनेकदा समाजाचा आरसा असण्याचे श्रेय देण्यात येते. तथापि, थोडे बारकाईने पाहिल्यास क्रिकेटमध्येही त्या त्या काळातील सामाजिक परिस्थितीची प्रतिबिंबे उमटलेली दिसतील. त्या अर्थाने अझरच्या टीमचा प्रवास हा भारतातील ग्लोबलायझेशनच्या पहिल्या दशकास समांतर होता. प्रायव्हेट चॅनेल ब्रॉडकास्टिंग, मल्टिनॅशनल ब्रँड स्पॉन्सरशिप आदी ठळक खुणांपलीकडे खरवडल्यास याचे अर्थ उलगडू लागतात. मग, भारतीय संघात ठेहराव, निग्रह नव्हताविजयाची भूक व सवय नव्हती आदी लक्षणे तत्कालीन समाजालाही लागू होतात का, हे जिज्ञासूंनी चाचपडून पाहावे. अगदी, भारतीय संघ नयन मोंगियाला सलामीला धाडण्यापासून श्रीनाथला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस पाठवण्यापर्यंत प्रत्येक सामन्यात बॅटिंग ऑर्डर बदलत होता, त्याचवेळी देशातही जवळपास प्रत्येक वर्षी सरकार बदलत होते, यात साधर्म्य किती आणि योगायोग किती, हे सुद्धा ज्याचे त्याने स्वतःपाशी ठरवावे. प्रगती तर होतेय, पण तिचे करायचे काय हे कळत नाहीय, या सामाजिक अवस्थेतच गांगुली आणि धोनीने सचिनचा संघासाठी जसा योग्य वापर करून घेतला, तसा अझरला का करता आला नसेल?’ या प्रश्नाचे उत्तर दडले आहे.

तर, या सर्व बाबी जमेत धरूनही अझरच्या संघात खिळवून ठेवण्यासारखे काहीतरी होते. पर्याय नव्हता, या स्वाभाविक उत्तरापलीकडचे काहीतरी. कारण, तसे तर आज जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराजची गोलंदाजी बघण्यास सरावलेल्यांना दोड्डा गणेश व अॅबी कुरुविलाकडून विकेटची अपेक्षा करण्यातील दुर्दम्य आशावाद समजावून सांगणे म्हणजे नळाखाली हात धरताच सेन्सरने पाणी येण्याची सवय असलेल्यांना सार्वजनिक हातपंपावरून कळशा भरून आणण्याचा नॉस्टॅल्जिया कथन करण्यासारखे आहे. मात्र, खेळाडूंच्या खेळण्या-वागण्यामध्ये फिल्टर्स, अदृश्य भिंती नसणे ही या संघाची सर्वांत मोठी जमेची बाजू होती. हे आपल्यापैकीच कोणीतरी खेळत असल्याची भावना सर्वसाधारण होती. स्लेजिंग ही तोपर्यंत गेमिंग स्ट्रॅटेजी म्हणून वापरली जात नव्हती. खेळाडू खरोखरच प्रतिस्पर्ध्यांवर चिडायचे आणि अशावेळी खेळाडूंना शांत करून खेळाची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी आपली आहे, याचे भान अझरसह त्या काळातील बहुतांश कर्णधारांनी बाळगले. खेळाच्या मनसोक्ततेपुढे जिंकण्याची ईर्षा दुय्यम होती. आपल्या कामगिरीचा आनंद (आणि आश्चर्य) खेळाडूंनाही प्रेक्षकांइतकाच होता. संघ स्पर्धा करण्यात उन्नीस-बीस असेलही, पण करमणूक करण्यात शत-प्रतिशत होता!

भारतीय संघाचे तोपर्यंत टीम इंडिया’, ‘मेन इन ब्ल्यू आदी नावांनी ब्रँड रिपोझिशनिंग व्हायचे होते. पूर्णपणे कमर्शियलाईज होण्यापूर्वीचा हा अखेरचा भारतीय संघ. संघातील प्रत्येक खेळाडू हा ब्रँड बनून त्याला मॅनेज करण्यासाठी पीआर, ग्रुमिंग एक्सपर्ट्स, कंडिशनिंग कोच इत्यादी प्रभृतींची फौज उभी राहण्यापूर्वीचाही अखेरचा संघ. त्याचप्रमाणे, On the receiver’s end, पानटपरीवर अनोळखी पंधरावीस जणांमध्ये जागा पटकावून आठ इंची टीव्हीकडे निरखून पाहणारे प्रेक्षकही अखेरचे याच संघाला लाभले. रस्त्यावरून जाताजाता इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांतील टीव्हींमध्ये काचेबाहेरून डोकावून जाणे, दूरवरून ऐकू येणाऱ्या जल्लोष किंवा सुस्काऱ्यांवरून चौकार-षटकार किंवा विकेटचा अंदाज बांधणे, पराभवानंतर संघाचे काय चुकले यावर सोबतच्या अनोळखी प्रेक्षकांशी एकमत होणे ही प्लुरॅलिटी व मल्टीकल्चरीझम नंतरच्या संघांच्या वाट्याला आला नाही. आधी एसएमएसवर स्कोअर अपडेट येऊ लागल्या, मग मॅच रेकॉर्ड करून सवडीनुसार बघण्याची सोय झाली, आता तर लाइव्ह स्ट्रिमिंगने क्रिकेट बघण्याचा अनुभवच एकवचनी करून टाकला. कर एकटाच किती जल्लोष करतोस ते बघूया!  

मॅच-फिक्सिंगच्या आरोपाने मात्र हे सगळं एका दिवसात विस्कटलं गेलं. सैरभैर झालं. बिग फन’च्याा कार्डांमध्ये श्रीमंती मोजणार्या सातवी-आठवीच्या मुलाला तुझे क्रिकेटिंग हिरो देशद्रोही असल्याचं सांगितलं गेलं. त्याची शहानिशा करण्याचे ते वय नव्हते. नंतरही ती केली गेली नाही. अल्पावधीतच गांगुलीने नव्या शतकातील भारतीय संघाची नवी स्वप्ने दाखवली. रममाण होण्याजोगी. मग आम्ही तीच आमच्या क्रिकेटप्रेमाची सुरुवात मानली. तसेही आधीच्या संघातले सचिन, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, श्रीनाथ, हरभजन या संघातही आलेच होते. जोडीला युवराज, सेहवाग, झहीर, कैफही आले. अझरच्या संघाच्या सिलेक्टिव्ह आठवणींतून खुद्द अझरच अलगद वगळला गेला. गांगुली-द्रविडची श्रीलंकेविरुद्धची 318 धावांची भागीदारी तर आठवते, पण त्यांना तिथपर्यंत येण्यासाठी पाठिंबा देणारा अझर नाही... 2012 मध्ये हायकोर्टाने अझरला फिक्सिंगच्या सर्व आरोपांतून मुक्त केले, तोपर्यंत आमच्यासाठी तो खूपच दूरस्थ झाला होता. त्याचे थोडेफार शैलीदार फटके वगळता काही म्हणजे काही आठवणींत उरले नव्हते.  

का कुणास ठाऊक, पण माझ्या मते भारताच्या सर्व वन-डे कर्णधारांना हा अनसेरेमोनियस गुडबायचा शाप आहेगांगुलीसारखा लढवय्या कर्णधार चॅपेलसोबतच्या वादानंतर कधी नेतृत्वपदावरून पायउतार झाला, हे समजलेही नाही. 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने साखळी फेरीतच भारताच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पॅव्हेलियनमधील द्रविडचा हताश रडवेला चेहेरा आजही कसंनुसा करून जातो. दोन वर्ल्ड कपसह तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीला निर्णायक क्षणी धावबाद झाल्यानंतर खांदे पाडून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागायला आणि त्यानंतर वर्षभर क्रिकेटपासून दूर राहून निवृत्ती जाहीर करावी लागायला नको होती. कसोटी पदार्पणात सलग तीन शतके ठोकण्याचा विक्रम रचणाऱ्या अझरने आपल्या ९९ व्या कसोटी सामन्यातही शतक झळकावले. यामुळे पहिल्या व अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला असला, तरी त्याचे कसोटींचे शतक पूर्ण होऊ शकले नाही ते नाहीच.

सत्यघटना आहे, २०१३ च्या रेल्वे बजेटवेळी संसदेबाहेर व्हिजिटर्स पास हातात घेऊन चेकिंगच्या रांगेत उभा होतो. आमच्या शेजारीच उशीरा येणाऱ्या खासदारांना थेट सभागृहात प्रवेश देणारे गेट होते. एकातरी महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्याला आज उशीर व्हावा आणि तो येथून जाताना आपल्याला जवळून दिसावा, अशी इच्छा आमच्या रांगेतील बरेचजण बाळगून होते. पहिल्या एक-दोन अनोळखी चेहेऱ्यांनंतर अचानक चिरंजीवी दिसला. तेलुगू चित्रपटचाहत्यांनी रांगेतूनच हाका मारल्या, त्याचे एक-दोन संवाद म्हटले. त्याने एक नजर बघितले, हसला आणि हात हलवून निघून गेला. थोड्या वेळाने त्याच गेटपुढे अझर आला. पुढचा मागचा काही विचार न करता अर्ध्याहून अधिक जणांनी रांगेतील आपल्या जागा सोडल्या आणि थेट अझरकडे धाव घेतली. आसपास कोणी अंगरक्षक नव्हते. अझर मैदानाइतकाच इथेही शांत, अलिप्त होता. त्याने एक-दोघांशी हस्तांदोलन केले. त्याच्या पायाला स्पर्श करणाऱ्या एक दोघांना उठवले. त्याच्यामुळे रांगेतले सदस्य कमी होऊन माझा संसदप्रवेश सुकर झाला होता. तरीही अख्खा रेल्वे बजेटचा तास मी एवढी काय अझरची क्रेझ आहे?’ ते ‘आपणही जायला पाहिजे होतं का?’ या दोन टोकांवर हिंदकाळण्यात घालवला.  

आता हे लिहित असताना गल्लीत काही मुले क्रिकेट खेळत असतील. कोणीही न करता त्यांच्यातील एकजण आपोआपच कप्तान होतो. कोणाच्या घरी बॉल गेला, तर मागून आणेल. कॉलनीतल्या चिडखोर काकांना शांत करेल. कोणाची काच फुटली, तर फोडणाऱ्याला पाठिशी घालेल. प्रत्येकाला बॅटिंग मिळण्याची खातरजमा करेल, पलीकडच्या गल्लीविरुद्ध सामन्यामध्ये भांडणे होऊ देणार नाही, झाल्यास सोडवेल. कालपरत्वे, शाळा-कॉलेज-जॉब-दुसरे शहर या प्रवासात बहुतांशजणांचे गल्ली क्रिकेट सुटते. अनेकजण कॉलनी, गल्ली सोडून दुसरीकडे राहायला जातात. कोणी तर परदेशात, कोणी कुठे- कोणी कुठे... कप्तान मात्र तिथेच. आता याला हवं तर अपयश म्हणा किंवा आणखी काही... पण बाकीची मुले कधीही शहरात परतली, तर जुन्या गल्लीत येऊन त्या कप्तानाला भेटल्याशिवाय जाणार नाहीत. येताना आपल्या मुलांनाही सोबत आणून इथे गाजवलेला पराक्रम सांगतील. लेखाच्या सुरुवातीची चर्चा त्यांच्यातही रंगेल. त्यांचा आपल्या बालपणासोबतचा सांधा त्या कप्तानाने जोडून धरला आहे आणि गल्लीगणिक नावे बदलत असली, तरी तो कप्तान अझर आहे!

Wednesday, July 15, 2020

हमारे बाद महफिल में….

‘चांद पर कदम रखनेवाला पहला इन्सान कौन था?’, भरलेल्या वर्गात वीरू सहस्रबुद्धे प्रश्न विचारतात.
‘नील आर्मस्ट्राँग, सर!’, वर्ग एकसुरात उत्तरतो. 
‘येस, नील आर्मस्ट्राँग. वी ऑल नो इट. मगर दुसरा कौन था?’
आता वर्ग क्षणभर शांत होतो. ही शांतता भेदत सहस्रबुद्धे आपलं तत्त्वज्ञान ऐकवतात.
डोंट वेस्ट युअर टाइम. इट्स नॉट इम्पॉर्टंट. नोबडी रिमेंबर्स अ मॅन व्हू एव्हर केम सेकंड!

थ्री इडियट्सच्या या सीनमधला प्रश्न बदलून जर ‘भारताला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा पहिला कर्णधार कोण?’ असे विचारले, तर कपिल देव हे उत्तर प्रत्येकालाच आठवेल. पण ‘दुसरा कर्णधार कोण?’चे उत्तर जर महेंद्रसिंह धोनी असे आले, तर ते चूक आहे. कारण, महेंद्रसिंह धोनीने २००७ मध्ये टी-२० चा वर्ल्ड कप उंचावण्याच्या सात वर्षे आधीच महंमद कैफने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये ही किमया साध्य करून दाखवली होती. खरेतर, कैफच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच अंडर-१९ चे विश्वविजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. परंतु, १३ जुलै, २००२ ला कैफने जे करून दाखवले, त्यासमोर त्याची आधीची आणि नंतरची सगळीच कारकीर्द पुसली गेली. आपल्याच एका यशामुळे स्वत:च्या अन्य कामगिरीवर नकळत झालेला असा अन्याय क्वचितच कोणाला सहन करावा लागला असेल.
महंमद कैफने अजूनही वयाची चाळिशी ओलांडली नाहीय. पण, तरीही भारताकडून त्याने शेवटचा सामना खेळण्याला तब्बल चौदा वर्षे उलटून गेलीयत. २०१७ मध्ये, अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर ११ वर्षांनी कैफने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. म्हणजेच, कैफ ऐन २६ व्या वर्षी भारतीय संघाबाहेर गेला आणि परत कधीच आला नाही. हे खरंच घडलंय? आणि यावर कधीच चर्चा नाही झाली? कैफ खरंच एवढा सामान्य खेळाडू होता का? आणि जर होता, तर इतक्या काळानंतरही आठवणीत कसा आहे? (वैयक्तिक नाही, तर सामुहिक आठवणीत. मागच्या वर्षी ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यू-ट्यूब शोमधील कैफच्या मुलाखतीला मिळालेले १७ लाख हिट्स, याचे निदर्शक आहे.)
मग आता सांगा, की जेमतेम चार-पाच वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द, मोजकीच शतके/अर्धशतके (२/१७), संस्मरणीय खेळ्या, एकहाती सामना जिंकून दिल्याचे प्रसंगही थोडेच, कर्णधार/उपकर्णधार किंवा तत्सम कोणत्याही पॉवर पोझिशनपासून कोसो दूर, एखाद्याच वर्ल्ड कपमध्ये सहभाग असलेले, असे किती खेळाडू आपल्याला पंधरा वर्षांनंतरही लक्षात आहेत? आणि नुसते लक्षात नाहीत, तर आपल्याला त्यांच्या आठवणीत रमायला आवडते? मग या यादीत जर आघाडीच्या आणि अनडिस्प्युटेबल नावांपैकी एक महंमद कैफचे असेल, तर कोई तो बात होगी बंदे मे?
महंमद कैफ आवडत नाही, असे सांगणारा माणूस मला अजून भेटायचाय (खरंच असा कोणी भेटला, तर तो माणूस कितपत आवडेल, हा प्रश्नच आहे.) आणि हे काही फक्त त्याच्या नॅटवेस्ट फायनलमधल्या कामगिरीपुरतं मर्यादित नाहीय. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार करता कैफ एक बऱ्यापैकी फलंदाज होता, अफलातून क्षेत्ररक्षक होता, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संघभावनेने (टीम स्पिरीट) नखशिखान्त पुरेपूर भरलेला होता. मैदानावरचा त्याचा उत्साहाने सळसळणारा चैतन्यपूर्ण वावर, दुसऱ्याचा रनर म्हणून खेळपट्टीवर येतानाही फलंदाजीसाठीच येत असल्यासारखा पवित्रा, स्लेजिंग, वाद आदी नकारात्मक गोष्टींना कुठेही थारा नसणारी क्रिकेटचा निखळ आनंद घेण्याची उर्जा, सतत ‘चिअरिंग मोड’मध्ये राहण्याची वृत्ती हे सगळं इतकं जिवंत, ताजं आणि विलोभनीय होतं की कैफबद्दल अनेकांच्या मनात चिरंतन आपुलकीने घर केलंय.
सा कैफचा भारतीय संघातील प्रवेशही मागच्या दारानेच झाला होता. युवा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला कसोटी संघामध्ये स्थान मिळाले होते खरे, पण एकाच कसोटीनंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर, २००३ च्या वर्ल्ड कपसाठी वर्षभर आधीपासून सौरव गांगुली आणि जॉन राइट यांची संघबांधणीची तयारी सुरू झाली आणि त्यामध्ये राहुल द्रविडकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी आली. परिणामी, एका फलंदाजाची जागा रिकामी झाली आणि कैफचा वन-डे संघात चंचुप्रवेश झाला, हे स्वतः त्यानेच सांगितलंय. कैफच्या आधी आणि कैफनंतरही भारतीय संघामध्ये सातव्या क्रमांकासाठी कधीच स्पॅशालिस्ट फलंदाजाचा विचार झाला नाही. परंतु, १३ जुलै, २००२ रोजी नॅटवेस्टच्या अंतिम सामन्यातील कैफच्या त्या ७५ चेंडूंमधील नाबाद ८७ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाबाबत जे अनेक नवे मापदंड निर्माण झाले, त्यापैकी कैफचे संघातील अढळ स्थान हासुद्धा एक होता.
यानंतरची काही वर्षे कैफ भारतीय संघात अक्षरशः बागडला. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस येण्याची लवचिकता, स्लॉग ओव्हर्समध्ये फटकेबाजी आणि निर्णायक क्षणी मोठी खेळी करण्याची क्षमता, वेगवान रनिंग बिटवीन दि विकेट्स, चपळतेला मूर्तिमंत करणारे क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो, युवराजच्या साथीने त्याने ऑफ-साइडला तयार केलेली तटबंदी, यांआधारे त्याने फिल्डर-ऑलराउंडरचे मिळवलेले बिरूद, १०० टक्के योगदान देण्याचा निग्रह या सगळ्याचा अमीट ठसा अनेकांच्या नॉस्टॅल्जियावर आहे. बिचाऱ्या हेमांग बदानीला आजही लोक पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात याच्या डोक्यावरून उडी मारून कैफने शोएब मलिकचा अचाट झेल घेतला होता, म्हणून ओळखतात. आता बोला!

महेंद्रसिंह धोनी संघात आल्यानंतर भारताला नियमित यष्टिरक्षक मिळाल्याने फलंदाजाचा एक स्पॉटही कमी झाला. कैफ भारतीय संघात आला, तेव्हा तो इतका काळ टिकेल, याची जशी कोणी कल्पना केली नव्हती, तसे २००६ मध्ये त्याला वगळण्यात आले, तेव्हा तो आता परत कधीच इंडियन जर्सीत दिसणार नाही, असेही कोणाला वाटले नव्हते. संघातील प्रवेशाप्रमाणे कैफची एक्झिटही वैशिष्टपूर्ण होती. कैफने कधीही संघात आत-बाहेर केलेले नाही. २००२ ते २००६ या सलग पाच वर्षांत तो अनुक्रमे ३२, २७, २२, २२, २२ सामने खेळलाय आणि त्यानंतर एकही नाही. अगदी दिनेश मोंगियालाही २००७ मध्ये एकदा संधी मिळाली, पण कैफसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले, ते कायमचेच.
भारताने टी-२०चे विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर वन-डे संघाचे नेतृत्वही धोनीकडे आले. संघाने पुन्हा एकदा कूस बदलली. या संघाची यंग ब्रिगेड वेगळी होती. त्याचा फटका सीनियर्सबरोबरच मिड-लेव्हलच्या खेळाडूंनाही बसला. गांगुली, कुंबळे निवृत्त झाले होते. धोनीच्या तरुण रक्ताबाबतच्या (presumably आपल्यापेक्षा ज्युनियर खेळाडूंसाठीच्या) अतिआग्रहामुळे साक्षात द्रविडलाच वन-डे संघातील स्थान गमवावे लागले, तिथे कैफची काय कैफियत? या सर्व काळात कैफ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता. रणजी क्रिकेटच्या ८६ वर्षांच्या इतिहासात उत्तर प्रदेशने मिळवलेले एकमेव विजेतेपद हे २००६ मध्ये कैफच्या नेतृत्वाखाली मिळवले आहे. त्यानंतर, २००८ आणि २००९ या लागोपाठ दोन वर्षी उत्तर प्रदेशने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि या कामगिरीचीही पुनरावृत्ती उत्तर प्रदेशला तेव्हापासून आजपर्यंत करता आलेली नाही. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या लिलावात कैफ हा राजस्थान रॉयल्सचा सर्वांत महागडा खेळाडू होता. असे असतानाही कैफने एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नाही. टी-२० क्रिकेटसारख्या त्याच्यातील अॅथलेटिसिझमला मुबलक वाव देणाऱ्या प्रकारासाठी कैफचा कधीच विचार का झाला नसेल? रॉबिन उथप्पापासून ते दिनेश कार्तिकपर्यंत अनेकांना पुनःपुन्हा संधी देणाऱ्या निवड समितीला एकदाही कैफवर विश्वास टाकावासा का वाटला नसेल? आज विचार करताना जाणवतं, की कैफ अपयशी नव्हता, सुमार तर अजिबातच नव्हता, फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. राँग टाइम,  अॅट दि राँग प्लेस.
भारतात क्रिकेटसोबत येणारी फ्रिंज बिनिफिट्स कैफला कधीही मिळालेली नाहीत. तो ब्रँड अॅबेसिडर असलेले एकही उत्पादन स्मरणात नाही. त्याची एकट्याची ना कधी कुठली जाहिरात होती, ना तो कधी रिअॅलिटी शोमध्ये दिसला. आणि तरीही तो कडवट बनलेला नाही. त्याच्याकडून कधीही ‘माझ्यावर अन्याय झाला’, ‘मी ग्रुपिझमचा बळी ठरलो’ इत्यादी विधाने आली नाहीत. स्वतः कैफ वर उल्लेख केलेल्या मुलाखतीत, २००० साली माझी संघात निवड करण्यात आली, तेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार नव्हतो, असं प्रांजळपणे कबूल करतो. आपल्या कामगिरीची आठवण ठेवणाऱ्या क्रिकेटप्रेमींना तुमची स्मृती चांगली असल्याचे सांगतो. अगदी ग्रेग चॅपेलवर बोलणेही हा माणूस टाळत असेल, तर त्याची नम्रता आणखी काय वर्णावी?
कैफच्या संघाबाहेर जाण्याला एक व्यक्तिगत दुखरी किनारही आहे. कैफचा भारतीय संघातील प्रवास आणि आमचे कोल्हापुरातील कॉलेज जीवन समांतर होते. कैफने लॉर्ड्सवर मर्दुमकी गाजवली, तेव्हा आम्ही अकरावीत प्रवेश घेऊन अवघे तेरा दिवस लोटले होते. पुढची चार-पाच वर्षे अगाध रिकामटेकडेपणाची होती. डे-नाइट मॅचसाठी घरी अड्डे जमवून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चेसाठी घोळके करण्याइतपत वेळ आमचा गुलाम होता. अगदी झिम्बाब्वे, केनिया संघांतील खेळाडूही कामगिरीसकट तोंडपाठ होते, तर भारतीय खेळाडूंबाबत तर विचारायलाच नको. आणि तत्कालीन भारतीय संघाने आपल्या कामगिरीने आमच्या या रिकामटेकडेपणाला चार चाँद लावले. आज सचिन, द्रविड, गांगुलीपासून ते अगदी लक्ष्मीपती बालाजीच्या नावानेही तमाम ९०‘ज कीड्स हळवी होतात, त्याचे एक कारण यातही दडलेले आहे. त्या वर्षांतील आमचे अनुभवविश्व समृद्ध करण्यात, आठवणी लख्ख सोनेरी ठेवण्यात त्या काळातील भारतीय संघाचा महत्त्वाचा वाटा आहे आणि कैफ हा त्या संघाचा अविभाज्य घटक होता. 
२००७ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताची नासधूस झाली, तेव्हा आम्ही फायनल इयरची परीक्षा देत होतो. त्यानंतरच्या काही महिन्यांतच कोल्हापूर सुटले. सोबत अड्डे सुटले, रिकामा वेळ सुटला. त्या पुढची दोन-चार वर्षे क्रिकेट जाताजाता, मिळेल तसे, मिळेल तिथे, मिळेल तेवढे बघण्यात गेली. (अगदी २०११ चा संपूर्ण वर्ल्ड कपही मी डेस्कवर बातम्या करत करत बघितलाय.) आयुष्य जरा स्थिरस्थावर होऊन पुन्हा अड्डे जमवण्याचे मनसुबे आखतो, तर तोपर्यंत क्रिकेटचा, भारतीय संघाचा चेहरामोहराच बदलून गेला होता. काही खेळाडू नजरेआड झाले, काही ओळखीचे चेहरे अनोळखी भासू लागले. धोनीने हेलिकॉप्टर शॉट सोडून जबाबदार कर्णधाराचा मुखवटा चढवला. सेहवाग, गंभीर, युवराज, झहीर, हरभजन यांचे महत्त्व कधीही नव्हते, इतके कमी झाले. हा संघ कॉम्पिटेटिव्ह होता, प्रोफेशनली खेळत होता, जिंकतही होता, पण त्याच्या यांत्रिकीकरणाने आमचा कनेक्ट हिरावून घेतला. ‘You can’t deliver results, thinking emotionally!’ हे वाक्य नव्या भारतीय संघाने इतक्या क्रूरपणे शिकवलं, की आम्ही क्रिकेटसोबतच्या रोमँटिसिझमला पारखे झालो. कैफचा मैदानावरील सदाहसतमुख निरागस चेहरा हे आमच्या त्या हरवलेल्या रोमँटिसिझमचे प्रतीक आहे.  
कैफ हा आपला तो मित्र आहे, जो लहानपणी आपण खेळायला बोलावल्यावर कधीही अभ्यासाचे किंवा आई-बाबा सोडत नसल्याचे कारण सांगत नाही. जो परीक्षेच्या वेळी स्वत:ची पर्वा न करता आपल्याला एक्स्ट्रा पेन देऊन मोकळा होतो. कॉलेजच्या ग्रुपमध्ये ठरणाऱ्या कुठल्याही प्लॅनसाठी त्याची कधीच ना नसते. त्याच्याकडे कधीही आपणहून काँट्रिब्युशन मागण्याची वेळ येत नाही. अशाने आपल्याला मात्र त्याच्या submissiveness ला गृहित धरण्याची सवय लागते आणि त्याची त्याबद्दल कधी साधी तक्रारही नसते. कालांतराने प्रत्येकजण आपापल्या करियर, आयुष्यात गुंतल्यानंतर ग्रुप विखुरण्यासाठी कितीसा वेळ लागतो? मग कधीतरी वीकेंड्सच्या पार्ट्यांपुरचे भेटणे होते. अशावेळीही हा मित्र आपल्या प्रेफर्न्स लीस्टमध्ये मागे पडत जातो. काही काळाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याइतके आणि स्टेटस लाइक करण्याइतकेच संबंध उरतात.
पुढे असेच एकदा आपण नव्या ग्रुपसोबत रेस्टॉरंट किंवा लाउंजमध्ये गेलो असता, योगायोगाने हा एकटाच एका टेबलावर बसलेला दिसतो. नजरानजर झाल्यावर जुन्याच मित्रत्वाने येऊन भेटतो, आत्मीयतेने बोलतो. आपले इतक्या वर्षांचे दुर्लक्ष त्याच्या गावीही नसते. आपण नव्या ग्रुपमध्ये रमलो असताना कधीतरी स्वतःचे बिल देऊन निघूनही जातो. घरी आल्यावर आपल्याला मात्र त्याचे तसे एकटे बसणे अस्वस्थ करत राहाते. आपण कधीच याला साधा मेसेज का केला नसेल, आपणहून भेटलो का नसू, याचा गिल्ट आपली पाठ सोडत नाही आणि भेटून मजा आली, पुन्हा भेटू. गुड नाइट!’ हा त्याचा मेसेज आपल्या इनबॉक्समध्ये खिजवत राहतो...

कोल्हापुरातील एका प्रसिद्ध चहाच्या हॉटेलमध्ये पूर्वी सदैव जुनी सुश्राव्य गाणी वाजत असायची. या हॉटेलच्या काउंटरमागे आजही संगीतकार मदन मोहन यांची फोटो फ्रेम असून त्याखाली पंक्ती आहेत, 

‘हमारे बाद महफिल मे अफसाने बयाँ होंगे,
बहारें हमें ढूंढेंगी, न जाने हम कहां होंगे!

…भविष्यात मी जर कधी चहाचे दुकान टाकले,  तर तिथे एका स्क्रीनवर सदैव जुन्या सामन्यांचे प्रक्षेपण सुरू असेल आणि हा शेर फक्त आणि फक्त कैफच्या फोटो फ्रेमसाठी राखीव असेल!

(छायाचित्र सौजन्य - वृत्तसंस्था)

Wednesday, February 19, 2020

‘इम्तियाझ’ आज कल…


कोलकात्यामध्ये हरलीनच्या घरासमोरील बाकड्यावर ऐटीत बसून खास तिने करून आणलेलाब्लॅक टीचवीने पिणारा वीर आठवतोय? सॅनफ्रान्सिस्कोच्या फुटपाथवर गुंडांकडून मार खाल्यानंतर आपलं खरं मीरावर प्रेम असल्याची जाणीव होऊन एकटाच हसत-रडत सुटणारा जय? किंवा जयने अखेरीस प्रपोज केल्यावर इतके दिवस आत दाबून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारी मीरा? इम्तियाझच्या मनावर कोरल्या गेलेल्या फ्रेम्सपैकी या काही...
31 जुलै, 2009 च्या दिवशी तास बुडवून, सात-आठ जणांना गोळा करून पावसाच्या रिपरिपीमध्ये चिखल-खड्ड्यांतून वाट काढत आणि अॅडव्हान्स बुकिंगसाठी एक तास आधी जाऊन तसाच भिजलेल्या रेनकोटमध्ये राहुल टॉकिजला लव्ह आज कल’चा फर्स्ट डे मॅटेनी शो पाहिला होता, तोपर्यंत इम्तियाझ अली स्टाइल ऑफ फिल्ममेकिंग हा ब्रँड म्हणून प्रस्थापित व्हायचा होता. त्याने त्याआधी फक्त दोन चित्रपट दिग्दर्शित केले होते आणि दोन्ही लव्हस्टोरीज् एकमेकांपेक्षा खूप भिन्न असूनही आपला असा फॅनबेस तयार करण्यात हे चित्रपट यशस्वी झाले होते. त्यातला जब वी मेटतर व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरल्यामुळे इम्तियाझ ए-लिस्टर्स’मध्ये पोहोचला होता. अर्थातच त्या लव्ह आज कलवर जब वी मेटच्या अपेक्षांचे ओझे होते आणि इम्तियाझने ते यशस्वीरीत्या हाताळले होते. चित्रपट पाहिल्यानंतर जब वी मेटच्या तुलनेत लव्ह आज कल’ला डावा ठरवणाऱ्यांनाही नेमक्या टिकेवर बोट ठेवता आले नव्हते. चित्रपट थक्क किंवा प्रभावित करणारा नसला, तरी आवडूनसा गेला होता.
त्यानंतर, इम्तियाझ चकित करत गेला. सरप्रायझेस देत गेला, प्रत्येक चित्रपटातून स्वतःची स्टाइल अधोरेखित करत गेला आणि त्याचवेळी नवनवे प्रयोग करून त्यांना आपल्या स्टाइलमध्ये सामावून घेत गेला. (त्याचा जब हॅरी मेट सेजलमी पाहिला नसल्यामुळे हे निरीक्षण  बाकीच्या सहा चित्रपटांपुरते आहे.)
कट टू 14 फेब्रुवारी, 2020. इम्तियाझ आता स्थिरावला आहे. अगदी जब हॅरी मेट सेजलचे दारुण अपयशही त्याला हादरवू शकणार नाही, इतका. त्याचप्रमाणे, इतक्या चित्रपटांनंतर त्याच्या सरप्रायझेसचा आवाका नक्की कुठपर्यंत असू शकतो, याची बऱ्यापैकी कल्पना येऊ लागली आहे. आणखी एक गंमतशीर गोष्ट म्हणजे, इतक्या वर्षांत त्याने मोडलेल्या चौकटींचाही आता एक साचा तयार झाला आहे. त्याच्या चित्रपटातल्यासारखी वास्तविकता आणि कल्पना (रिअॅलिझम आणि फँटसी) यांच्या सीमारेषेवर उभी असणारी पात्रे, वरवरची खपली काढल्यानंतर उघडे पडणारे त्यांचे गोंधळ, इनसिक्युरिटीज्, आयडेंटिटी क्रायसिस इत्यादी सॉर्ट आउट होईपर्यंतचा प्रवास आदी एकेकाळची अपारंपरिक (unconventional) लक्षणे आता इतर दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधूनही सर्वपरिचित झाली आहेत. त्यामुळे एकाच वेळी इम्तियाझचा ट्रेडमार्क असलेलं सगळं तो त्याच्या चित्रपटात करतो का, आणि त्यापेक्षा वेगळं काही करू बघतो का, या दोन टोकांवर इम्तियाझच्या फॅनबेसचा लंबक झुलत असतो.
नव्या लव्ह आज कलबद्दल बोलायचं झाल्यास, यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचअंशी सकारात्मक आहे. किंबहुना, इम्तियाझच्या आतापर्यंतच्या चित्रपटातील प्रत्येकाची काही ना काही झलक या लव्ह आज कलमध्ये पाहायला मिळते. ये दूरियाँकिंवा जिंदगीसारखे चित्रपटाचा टोन सेट करणारे गाणे आहे, ‘तुमसे ही गाण्यात आदित्य काल्पनिक गीतसोबत पावसात बेभान होऊन नाचतो, तसे नृत्य आहे, ‘तमाशातील वेदप्रमाणे आपल्या उपजत व्यक्तिमत्त्वाला दाबले जाणे आहे आणि उत्कट क्षणी त्याचे विस्फोटकरीत्या बाहेर येणे आहे, रॉकस्टारच्या जनार्दनचा आत्मनाशापासून आत्मशोधापर्यंतची (Self distruction to self-discovery) वाटचाल आहे, इम्तियाझचा आवडता हिमालय आहे आणि त्याच्या सानिध्यात हायवेतल्या वीराला मिळणारी शांतताही आहे. सोबतीला रूमी आहे, इर्शाद कामीलचे गहिरे शब्द आहेत, प्रितम क्वचितच देतो, तसे ठेवणीतले संगीत आहे, अरिजितचा सोलफुल की काय म्हणतात, तसा आवाज आहे, इम्तियाझची स्वत:ची अशी दृश्यात्मकता आहे आणि तरीही

हे सर्व साकारण्यासाठी इम्तियाझने निवडलेला प्लॉट आणि फॉर्म हे दोन्ही भलतेच सरधोपट असल्याने एकूण परिणाम उणावतो. दोन काळांना एकत्र आणणारे सामायिक नेपथ्य म्हणून इम्तियाझ पुन्हा एकदा कॅफे-रेस्टॉरंट निवडतो, इथपर्यंत ठीक; पण तेथे घडणारे संवाद आणि उलगडणारे प्रसंग पाहता आधीच्या लव्ह आज-कलचा प्रभाव म्हणावा की कॉपी-पेस्टअसा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. यावेळी बदल म्हणून लव्ह आज कलपैकी आजच्या कथानकाची प्रोटॅगनिस्ट ही नायिका आहे आणि नायक तिचा लव्ह इंटरेस्टआहे. त्याचवेळी कलची कथा मात्र नायकाच्या नजरेतून उलगडते. हे दोन्ही पात्रांचे भार यशस्वीपणे पेलण्यात लेखन पातळीवर इम्तियाझ आणि अभिनय पातळीवर अनुक्रमे सारा अली खान (झोई) आणि रणदीप हुडा (रघू) कमी पडले आहेत. साराचा संपूर्ण चित्रपटभर वावर आत्मविश्वासपूर्ण असला, तरी आवाजाच्या एकसुरी प्रोजेक्शनमुळे तिच्या मर्यादा उघड होतात. याउलट रणदीपसारख्या ताकदीच्या अभिनेत्याला संहितेनेच जखडून ठेवल्यामुळे तो निवेदकाच्या स्तरावर येऊन थांबतो आणि ऋषी कपूर यांनी वीर सिंग पानेसरच्या व्यक्तिरेखेला दिलेल्या चार्मच्या जवळपासही पोहोचू शकत नाही.
वीर (कार्तिक आर्यन) हे नव्या लव्ह आज कलमधील सर्वांत कॉम्प्लेक्स पात्र आहे. त्याच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला कंगोरे आहेतच, पण त्याचबरोबर त्याची प्रेमकथेतील भूमिका (म्हणजे त्याने घेतलेली) ही तमाशातील ताराच्या भूमिकेला साजेशी आणि अधिक व्यापक आहे. याच गुंतागुंतीमुळे या लव्ह स्टोरीला वेगळे डायनॅमिक्स प्राप्त होते. तथापि, हे पात्र इम्तियाझ बहुतांश वेळा झोई किंवा रघूच्या नजरेतून दाखवतो आणि त्याचवेळी झोईच्या पात्राला कधीच स्वत:बाहेर पडू न दिल्यामुळे वीर व तिच्यामधील कॉन्फ्लिक्ट गडद करण्याची संधी गमावतो. तीच गोष्ट १९९० च्या रघू आणि लीना (आरुषी शर्मा) या जोडीची. तुटक-तुटक प्रसंग जोडून एकत्र बांधलेली ही विसविशित कथा ना एकाही क्षणी रिलेटेबल होते, ना धड नॉस्टॅल्जिया आळवते, ना आजच्या काळाशी समरूपता दर्शवते. कार्तिकचा अभिनय वीरच्या भूमिकेत आणि टीनएजर रघूच्या भूमिकेत प्रभावी आहे. वीरवरची पकड तो शेवटपर्यंत कायम ठेवतो, मात्र रघूचा कालानुक्रम दाखवण्यासाठी देण्यात आलेल्या प्रत्येक नव्या गेट-अपगणिक त्याची कामगिरी खालावते. आरुषी शर्मा चित्रपटात फक्त आहे.

आता दुसरा प्रश्न मग, इम्तियाझ वेगळं नक्की काही करतो तरी का? याचे उत्तर मात्र नकारार्थी द्यावे लागते. खरेतर बिलिव्हेबल व्यक्तिरेखा निर्माण करणे आणि त्यांना रिलेटेबल संवाद देणे हे इम्तियाझचे बलस्थान. मै अपनी फेव्हरिट हूँ!,’ हे गीतचे वाक्य आजही कितींचे फेव्हरिट आहे... किंवा हम नॉर्मल लोग है... आम जनता, दि मँगो पीपल!,’ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. ही पात्रे सर्व मानवी गुणावगुणांची सरमिसळ आहेत. ही पात्रे त्याग करताना उदात्त होत नाहीत आणि स्वार्थी वागताना अपराधीही होत नाहीत. इम्तियाझ त्यांना मानवी पातळीवर आणून identifiable बनवतो. ‘जब वी...’ मध्ये आपण मनजीतसोबत चुकीचे वागतोय, हे माहीत असूनही गीत तसे वागणे सुरू ठेवते. लव्ह आज कलमध्ये मीरा नुकताच पती झालेल्या विक्रमला ‘मी तुझी नंतर माफी मागेन, पण आता मला निघायचंय’, असे स्पष्टपणे सांगते. ही कॅरेक्टर्स एकाच वेळी अविचारी आणि समजूतदार असतात. हायवेमध्ये वीरा ‘मूल होऊन अपहरणकर्त्या भाटीच्या कुशीत शिरते. मात्र, तो जेव्हा आईच्या आठवणीने व्याकूळ होतो, तेव्हा त्याला आई बनून सांभाळूनही घेते. सोचा ना थामध्ये वीरेनला मिळवण्यासाठी आकांडतांडव करणारी कॅरेन, आपला ‘एक्स आनंदी नाही, हे लक्षात येताच स्वतःहून अदितीला कन्व्हिन्स करण्यासाठी तडक तिच्या घरी जाऊन धडकते. नवऱ्याला सोडून जयकडे निघालेली मीरा नुसत्या फोनवर त्याला सॅनफ्रान्सिस्को प्रोजेक्ट’ मिळाल्याचे कळताच माघारी फिरते.

नव्या ‘लव्ह आज कल’मध्ये मात्र इम्तियाझ पात्रांच्या या ह्युमनायझेशनमध्ये कमी पडतो. त्याची पात्र त्यांच्या ट्रेट्सविषयी बोलतात तर खरं, पण त्यानुसार वागत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या खरेपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. उदाहरणार्थ, करियर ही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानणाऱ्या आणि त्यापुढे किमान पाच वर्षे तरी प्रेमासाठीही वेळ नसणाऱ्या झोईकडे उठसूट देवळात प्रवचनाला आल्याप्रमाणे ‘हां... करा सुरू तुमची प्रेमकथा’ म्हणत रघूसमोर ऐकत बसण्याइतका वेळ कुठून आला? किंवा लीना स्वतःहून सर्व गोष्टींची कन्सेंट देत असताना रघू बाहेरख्यालीपणा का करेल? हे व यासारखे प्रश्न निर्माण होणे मनात निर्माण होणे, हेच प्रेक्षकांचे व्यक्तिरेखामध्ये न गुंतण्याचे निदर्शक असून इम्तियाझच्या स्क्रिन प्लेच्या मर्यादा अधोरेखित करणारे आहे. उदयपूरचा अपवाद वगळता इम्तियाझ या चित्रपटातील पात्रांना त्यांच्या सराउंडिंग्जशी जोडण्यातही मागे राहातो. त्यामुळे व्यक्तिरेखांना त्यांच्या बॅक स्टोरीज मिळतच नाहीत.
या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणून चित्रपटाचा अँटी-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स दोन्ही सपाट आणि उथळ राहिले आहेत. कल आणि आज या दोन्ही कथांच्या शेवटामध्ये प्रेक्षक तटस्थ आणि त्रयस्थ राहतो. त्याला इम्तियाझ इन्वॉल्व्ह करून घेऊ शकत नसेल, तर गेल्या दोन तासांपासून जंग जंग पछाडून, आपल्याला येणारे सगळे पैंतरे वापरून आणि एकूणच आपल्या जुन्या सिनेमाला नव्या आयामासह सादर करून इम्तियाझने मिळवले तरी काय ना?
पहिल्या लव्ह आज कलमध्ये जय विमानतळावर मीराला भेटायला जातो, तेव्हा तिच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘मुझे पता था तुम आओगे, इतने साल बाद सरप्राइझ देना थोडा मुश्किल है!’ या नव्या लव्ह आज कलमध्ये एके ठिकाणी रणदीप हुडा म्हणतो, ‘अगर मैं ला सकता, तो ये सब कुछ दे कर भी, वो पुरानी स्टुपिडिटी वापस लाकर जी लेता!’ नव्या लव्ह आज कल नंतर इम्तियाझचे वर्णन करण्यासाठी हे दोन संवाद सार्थ आहेत. इतक्या वर्षांनंतर त्याची सरप्राइझ करण्याची अॅबिलिटी कमी होत चाललीय आणि त्याचबरोबत त्याच्यातील स्टुपिडिटीही... संहितेत आणि पडद्यावरही हे झाकण्याची चाललेली धडपड जेव्हा उघड होते... त्याहूनही  क्लेशदायक म्हणजे आतापर्यंत आपल्या चित्रपटातून झाकलेल्या गोष्टी उघड करणाऱ्या दिग्दर्शकाकडून जेव्हा हे होते... तेव्हा, रूमीसकट सगळ्या गोष्टी उताण्या पडतात आणि ‘जो बूंद से गयी, वो... ती जातेच!